मुंबई : येथील उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, नुकतेच या केंद्राचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या वेळी सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजचे माजी विभाग प्रमुख डॉ. विनोद लाहिरी उपस्थित होते.
या वेळी अतुल कुलकर्णी म्हणाले, ‘वैद्यकीय क्षेत्रातील या महत्त्वाच्या बदलाने आयुष्य वाढवले आहे. वैद्यकीय शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे गंभीर आजारांवरही मात करणे शक्य झाले आहे.’
‘रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अधिक अचूकता, कमीत कमी रक्तस्राव, लवकरात लवकर बरे होण्याची खात्री आणि नैसर्गिक हालचाली असे अनेक फायदे रुग्णांना मिळतात. रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया ही पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा नक्कीच फायदेशीर आहे,’ असे अस्थिरोगतज्ञ आणि उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक्सचे प्रमुख डॉ. तेजस उपासनी म्हणाले.
‘या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण दोन ते तीन दिवसात घरी जाऊ शकतो. यामुळे रुग्णालयात राहण्याचा खर्चदेखील कमी होतो, तसेच वेदना खूपच कमी झाल्याने वेदनाशामक औषधांचा वापर कमी होतो. शस्त्रक्रियेनंतरचा त्रासही खूप कमी असतो. त्यामुळे रोबोटिक तंत्रज्ञान रुग्णांसाठी एक वरदानच आहे,’ असेही डॉ. उपासनी यांनी नमूद केले.